Saturday, July 25, 2020

तुमच्या मुलाच्या अभ्यासची गती वाढण्यासाठी एक सोपी युक्ती


जेव्हा मुले संध्याकाळी खेळून घरी येतात, क्लासला जाऊन येतात, किंवा दमून घरी येतात, तेव्हा कधीही मुलांना आल्या-आल्या आता अभ्यासाला बसाअसं अजिबात सांगू नका. विशेषत: खेळून आल्यावर तर नाहीच नाही. कारण अशावेळीहे वाक्य ऐकलं की मुलांना संताप येतो. अभ्यासाविषयी मनात अनास्था निर्माण होते. आणि मग अभ्यास न करण्याच्या नवनवीन सबबी मुले सुरू करतात. या सबबी ऐकल्या की तुमचं डोकं फिरू लागतं. अशावेळी तुमच्या मुलाला समजून घेण्याऐवजी, तुमच्या अंतर्मनात दडून असलेला राग एकदम उसळून वर येतो, तुम्ही बोलू लागता, “एव्हढावेळ खेळ झाला, टाइमपास झाला, तरी समाधान झालं नाही. अजूनही तुला अभ्यास करायचा नाही. तू काय ठरवलं आहेस तरी काय?”

 लक्षात घ्या, या तुमच्या प्रश्नाला उत्तर न देता मुलं गप्प बसतात. तुमच्याकडे एकटक पाहात तरी राहतात, किंवा तुमची नजर चुकवून, नेमकी तुम्हाला नावडणारी एखादी कृती करतात. या गोष्टीचा तुम्हाला निश्चितच अतिशय राग येतो. आणि मग तुम्ही विचारलेल्या प्रश्नाला तुम्हीच उत्तर देता, जी तुम्हाला सोयीची असतात.

 यामुळे, तुम्ही आणि तुमचा मुलगा यामधे विनाकारण नकळत क्रोधामुळे, एक दरी निर्माण होते. अभ्यास बाजूलाच राहतो. विषय भरकटतो. आणि सगळा राग त्या मुलावर म्हणजेच, पर्यायाने अभ्यासावर निघतो. अशा संतप्त वातावरणात, आणि ज्वालामुखीच्या सहवासात, मुले कदापी अभ्यास करू शकत नाहीत.

 हे सारं घडल, कारण तुम्ही तुमच्या मुलाचं मन समजून न घेता, त्याला विश्वासात न घेता, त्याची प्रेमाने विचारपूसही न करता, थेट तुम्ही त्याला झापायलाच सुरुवात केली आहे. 

 आपण बदलूया. आपण आपलं मूल अधिकाधिक समजून घ्यायचा प्रयत्न करुया. त्याच्यावर विश्वास टाकूया, आणि पाहा चमत्कार होतो की नाही...!!!

 मुलगा संध्याकाळी दमून घरी आला, क्लासमधून घरी आला, किंवा खेळून घरी आला की, लगेचच अभ्यासाचा विषय काढूच नका. आज दिवसभरात काय मजा आली? ते विचारा. त्याच्या खास मित्र मैत्रिणींची चौकशी करा. 

 तू दमला असशील, आता पाच मिनिटं अगदी शांत निवांत बस बघू...असं ही म्हणा आणि मग, “आता आपण तुझ्या अभ्यासाचे पाहूयाअसं स्मितहास्य करीत त्याला अगदी सहज म्हणा... थोडं स्थिरस्थावर व्हायला त्यालाही थोडा अवकाश द्या. विश्वास ठेवा, यानंतर मुले मनापासून अभ्यास करतात.

 सक्ती केल्याने, लादल्याने, अभ्यासाबाबत टोचून बोलल्याने, किंवा सारखे कर-कर म्हंटल्याने, मुले अजिबात अभ्यास करत नाहीत... ती फक्त अभ्यास करत असल्याचा देखावाकरतात. पुस्तक डोळ्यासमोर आणि मनात विचार दुसरेच. कारण तुमच्या अशा वागण्याने त्यांना असुरक्षित वाटत असतं.

 पालक जेव्हा आपलं मन मोठं करतात, आणि आपल्या प्रेमाची जाणीव आपल्या कृतीतून करुन देतात, तेव्हा त्यांची मुलं आश्वस्त होतात. जेव्हा दडपण नसत, तेव्हा मुलांना अभ्यासाचा देखावा करावा लागत नाही. मुले मोकळ्या मनाने अभ्यास करतात. आणि हेच तर आपल्याला हवं आहे. 

 जेव्हा पालक स्वत:त दहा टक्के बदल करतात, तेव्हा मुलात शंभर टक्के बदल होतो, हे लक्षात घ्या

 


पालकांनो, मुलांना थोडा वेळ द्या, त्यांना समजून घ्या!


हल्ली मुलांचे संगोपन करणे म्हणजे कौशल्याचे काम आहे. कारण स्पर्धात्मक युगात माझी मुलगी किंवा माझा मुलगा मागे पडू नये यासाठी पालकांना सतत चिंता सतावत असते. पण लक्षात घ्या मुलं हे मातीच्या गोळ्याप्रमाणे असतात त्याला जसं घडवू तसं ते घडतं. मुलांना आपण जे सांगू किवा आपण जसं बोलतो त्याचा परिणाम मुलांवर होतो. 

 त्यामुळे पाल्याची बौद्धिक, मानसिक, शारीरिक, वाढ होत असताना वस्तुरूपी प्रेम नाही तर तुम्ही दिलेला वेळ बहुमूल्य असतो. त्यामुळे पालकांनी   TV, Laptop, Computer, Tab, Mobile बाजूला ठेवून काही मुलांसोबत गप्पा मारायला हव्यात. हा उपक्रम खूप सकारात्मक बदल घडवून आणतो, आपल्यात आणि आपल्या पाल्यातही. आजची पिढी Gadget प्रिय. ती काळाची गरज सुद्धा आहे पण आपला पाल्य Gadget वर किती वेळ असतो. नेमक इंटरनेटवर काय Surfing करतोय? यावर लक्ष ठेवायला काहीच हरकत नाही. मात्र ते ही त्याला नकळत. 

 सध्या स्वतःला त्रास देणं (self harm), चिडचिड करणं, सतत रागावणं, ह्या गोष्टी सध्या मुलांमध्ये जास्त दिसून येतात. अशात मुलांशी बोलण्यात काहीच उपयोग नसतो. यावेळी आपलाही पारा चढण्याची शक्यता असते. अशा वेळी पाल्याचे म्हणणे नीट ऐकून घ्यावे. नेमक्या कुठल्या मुद्यावर चिडचिड होतेय ते समजून घ्यावे. राग, चिडचिड कमी झाला कि शांतपणे आपला मुद्दा समजावून देता येतो. प्रसंगी ज्या मुद्द्यावरून चिडचिड झाली आहे त्याचीच गोष्ट तयार करावी, आपल्या पाल्याला केंद्रस्थानी ठेवावं आणि गोष्टी रूपातून आपला मुद्दा पटवून देता येईल. 

 एखाद्या वस्तूचा अट्टाहास पाल्याने धरला असेल तर ती खरंच गरजेची आहे का? हे बघणं गरजेचं आहे किंवा त्या वस्तू ऐवजी दुसरी जी उपयोगाची वस्तू आहे ती देणं कधी हि सोयीस्कर. पण कधी-कधी नाही म्हणायला हरकत नाही. नाही म्हणण्यात ही गंमत आहे. नाही म्हणणं सुद्धा एक कला आहे. होतं काय, मुल वयात येत असताना त्यांना स्वतंत्र पणाची जाणीव होत असते. 

 मग त्यांना त्यांच्या आवडी-निवडी प्रमाणे राहायला, वागायला आवडतं. यावेळी थोड त्यांच्या म्हणण्या नुसार चालवं. त्यांच्या आवडी-निवडी जाणून घ्याव्यात. पाल्याला त्याच्यासाठी काय योग्य आहे याची जाणीव करून द्यावी. मुलं चुकीच्या मार्गीला जाऊ नये यासाठी वेळोवेळी त्यांच्या Friend Circle चा आढावा घेणे खूप गरजेचे आहे. मुळात मुलांना थोडासा वेळ देणं आणि त्यांच्या गरजा समजून घेणं याशिवाय पालकत्व वेगळे नाही.